Saturday, 10 November 2018

नवी दृष्टी ( Paradigm Shift)

                            नवी दृष्टी
              १९ वर्षाचा एक युवक धावत्या ट्रेनच्या खिडकीतून अतिउत्साहाने व हर्षोल्हासित होऊन बाहेरील दृष्य पाहत होता. तो आनंदाने टाळ्या पिटत होता, मध्येच ओरडत होता.त्याच्या चेहऱ्यावर लोकांना अत्यानंद झाल्याचा भाव दिसत होता पण त्याचे वय पाहता हे सर्वकाही सहप्रवासी लोकांना अनपेक्षित वाटत होते. त्याने आश्चर्यचकित होऊन आपल्या वडिलांकडे पाहिले व म्हणाला,"बाबा, पहा ना ही सर्व झाडे पाठीमागे जातायत आणि आकाशातील ढग आपल्यासोबत पळतायत." बाबांनीही चेहऱ्यावर मंद हसू आणत त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला.त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंदाचे भाव होते.ते दोघेही त्यांच्या विश्वात रममाण झाले होते, पण इतरांना मात्र मुलाचे हे वागणे समस्याप्रधान वाटत होते. जवळच बसलेल्या एका जोडप्याला तर त्या मुलाचा खूपच राग आला होता.त्याच्या ओरडण्यामुळे त्यांची चांगलीच चिडचिड झाली होती. न राहून त्यांनी मुलाच्या वडिलांना विचारले," तुम्ही, तुमच्या मुलाला एखाद्या चांगल्या दवाखान्यात का नाही दाखवत?" वडिल हसऱ्या चेहऱ्यानेच त्यांच्याकडे पाहून म्हणाले," हो, आम्ही आता थेट दवाखान्यातूनच येत आहोत ते ही डोळ्यांच्या.माझा मुलगा जन्मतः अंध होता. आजच त्याला नवीन दृष्टी मिळाली आहे.आज पहिल्यांदाच तो डोळ्यांनी हे जग पाहतोय."
               वडिलांचे हे शब्द ऐकून  सर्वांच्या मनात लज्जाभाव उत्पन्न झाला.आपल्या बाबतीत असे घडले असते तर आपणही असेच वागलो असतो असे सर्वांना वाटू लागले.त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झाली. अगोदरच्या राग,चिडचिडेपणा व किळस या भावनांची जागा दया, करुणा व तदानुभवाने घेतली.
             आपल्यासोबतही असं बऱ्याचदा घडतं याच कारण म्हणजे आपण लोकांचं  केलेलं चुकीचं मूल्यमापन (judging). आपण कोणतेही वास्तव जाणण्याअगोदार लोकांच्या बद्दल मते बनवलेली असतात,गृहीतके मांडलेली असतात. लोकांच्या दिसण्यावरून, त्यांच्या कपड्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून,वागण्यावरून,आवडी-निवडी वरून त्यांची प्रतिमा(इमेज) आपण बनवलेली असते जी वास्तवाला धरून असत नाही.न्यूरोलिंगविस्टिक प्रोग्रामिंग मध्ये एक तत्व आहे, नकाशा म्हणजे भूप्रदेश नव्हे(The map is not the territory) अगदी त्याप्रकारेच व्यक्तीचे वर्तन,त्याचे दिसणे, त्याचे कपडे वा त्याचे बोलणे यांच्या मूल्यमापनाने व्यक्तीबद्दलचे आपण बनविलेले मत म्हणजे व्यक्ती असं होऊ शकत नाही. व्यक्तीच्या प्रत्येक वर्तनामागे एक कारण असते आपण ते जाणून न घेता फक्त वर्तनावरून त्यांच्यावर कोणताही शिक्का मारणं योग्य होणार नाही.
             लोकांच्या बद्दल बनवलेल्या चुकीच्या मतांमुळे त्यांच्या सोबत होणारी आंतरक्रिया ही प्रभावी,मानवी व फलदायी होणार नाही त्यामुळे सदृढ नातेसंबंध तयार होऊ शकत नाहीत. व्यक्ती, वस्तू किंवा घटना या बद्दलची आपण ठरविलेल्या मतांना छेद देणारी वास्तविक माहिती प्राप्त झाल्यावर आपले भावविश्व पूर्णपणे बदलते आपल्या मनातील राग ,द्वेष, ईर्षा,चिडचिडेपणा,अहंकार यासारख्या भावनांची जागा निश्चितच दया,करुणा, प्रेम,सहकार्य,मनमिळाऊपणा, यासारख्या उदात्त भावना घेतात यालाच प्रसिध्द प्रशिक्षक स्टीफन कोव्ही व्यक्तींमधील आमूलाग्र बदल (paradigm shift) असे म्हणतात. अश्या प्रकारचा आमूलाग्र बदल करणेसाठी आपण स्वतः किंवा इतरांनी ठरवून ठेवलेल्या मतांपेक्षा व्यक्तीच्या वर्तनामागील कारणापर्यंत पोहचायला हवे,वास्तव स्वरूपापर्यंत पोहचायला हवे तेव्हाच आपण समोरील व्यक्तीला खऱ्या अर्थाने समजून घेतलं अस म्हणता येईल. व्यक्ती व्यक्ती मध्ये गैरसमज निर्माण करणारी, व्यक्ती आकलनाला मर्यादा आणणारी व मानवातील मानवीयता संपवणाऱ्या अशा अंधदृष्टीपेक्षा आपणास प्रगल्भ करणारी नवी दृष्टी लाभावी व जगाकडे पहिल्यांदाच पाहण्याचा जो आनंद वरील युवकाला झाला तसाच आपणा सर्वांना व्हावा ही सदिच्छा!

No one can see the reality until opening the mind's eyes.

Mr. Abhijeet Manav.
(Mind trainer & NLP practitioner)

3 comments: