Sunday, 18 November 2018

प्रत्याभरणाचे तत्व.( Principle of the feedback)

            प्रत्याभरणाचे तत्व ( Principle of the feedback)

     यशस्वी जीवन हा आजकाल एक परवलीचा शब्द झालेला आहे. कुटुंब, समाज,प्रसार माध्यमे,विविध जाहिराती या सगळ्यांकडून व्यक्तीने यशस्वी होणं किती गरजेचं आहे याचे डोस व्यक्तीला नेहमीच पाजले जातात आणि म्हणूनच हरेक व्यक्ती यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करतोय.पण नेमकं यशस्वी होणं म्हणजे काय? हे सांगणे फार कठीण आहे. यश हे व्यक्तिसापेक्ष असते. ज्याची त्याची यशाची वेगळी व्याख्या असते. यश काहीही असू शकते जस की एखाद्या विद्यार्थ्यांसाठी ९०% गुण प्राप्ती म्हणजे यश असू शकते तर एखाद्यासाठी अगदी ४०% गुण प्राप्त करणे सुद्धा यश असू शकते.यशाबद्दलच्या दृष्टिकोणात विविधता जरी असली तरी यश प्राप्तीच्या मार्गावर होणाऱ्या अपेक्षा भंगाकडे म्हणजेच अपयश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन विकसित होणं आवश्यक आहे. कारण अपयशाकडे व्यक्ती कशी पाहते यावरच त्याचा यशाचा पर्यायाने जीवनाचा प्रवास सुखकारी असणार की वेदनादायी असणार हे अवलंबून आहे.अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणून अपयशाला सकारत्मकतेने पाहण्यासाठी व्यक्तीला उद्युक्त केले जाते पण व्यक्तीला वारंवार अपयशाला सामोरे जावे लागले तर या म्हणीवर त्याचा विश्वास दीर्घकाळ टिकत नाही मुळातच अपयश हा पूर्णपणे नकारात्मकता दर्शवणारा शद्ब आहे यात शंका नाही.आजकाल ज्या प्रकारे यशस्वी होण्यासाठी समाजाकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या व्यक्तीला जो तगादा लावला जातो त्यामुळे,शिवाय आपण यश संपादन करू शकलो नाही तर समाजाकडून  आपण अपयशी ठरवले जावू या भावनेतून व्यक्तीला येणारे ताणतणाव, निराशा, उदासीनता,खिन्नता यामध्ये प्रचंड वाढ होताना दिसते आहे.
               यशाकडे व्यक्तिसापेक्ष दृष्टिकोनातून पाहण्यासाठी व यशप्राप्ती करताना होणाऱ्या अपेक्षा भंगातून निर्माण होणाऱ्या बिकट मानसिक अवस्थेतून सही सलामत बाहेर पडून यशाकडे पुन्हा सकारात्मकतेने वाटचाल करणेसाठी आपण प्रत्याभारणाच्या तत्वाचा अंगीकार केला पाहिजे. हे तत्व माणसाला यशप्राप्ती मार्गावरील आव्हानांकडे व अपयशी समजले जाणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा प्रगल्भ, सकारात्मक व निरंतर शिकत राहण्याचा उदात्त दृष्टिकोन प्रदान करते. हे तत्व सांगते की ,जीवनात अपयश असतंच नाही,तर फक्त प्रत्याभरण असते.(There is no failure only feedback).यशप्राप्ती करत असताना जर व्यक्ती मध्येच थांबली तर यास आपण अपयश असे न पाहता प्रत्यभारणाच्या दृष्टीने पाहिले तर आपण निराश,उदासीन वा तणावग्रस्त होण्याऐवजी आपण त्यातून नेमकं काय शिकलो,आपण कुठे कमी पडलो होतो, यातुन आपल्या कोणत्या क्षमतांना आव्हान मिळाले आहे, आपण त्या कशा विकसित करू शकतो,आपण कोणकोणत्या नवीन पर्यायांचा विचार करू शकतो या सारख्या असंख्य बाबींचा विचार करून पुन्हा जोमाने यशप्राप्तीकरिता झेप घेऊ शकतो.
            प्रत्याभरण सकारात्मकता दर्शविते तर अपयश नकारात्मकता. अपयशी समजले गेलेल्या घटनेकडे प्रत्यभारणाच्या दृष्टीने पाहणे व्यक्तीच्या धारणेत, विचारात व वर्तनात आमूलाग्र बदल घडविते व व्यक्तीस अशा अनपेक्षित घटनेसोबत दोन हात करण्यास अधिकतम ऊर्जा देऊन मानसिक बळ निर्माण करते शिवाय निश्चित केलेल्या ध्येयाकडे जाण्याचे नवीन मार्ग निर्माण करून अधिकाधिक क्षमतांचा विकास करते.

Let's replace failure with feedback to bounce back.

Mr. Abhijeet Manav.
(Mind trainer & NLP practitioner)



No comments:

Post a Comment

Beyond Habits: The Power of an Identity Shift

  Beyond Habits: The Power of an Identity Shift Most people approach change backward. They say, "If I go to the gym every day (Action),...