Sunday, 26 January 2020

EMOTIONAL INTELLIGENCE (EQ)

                       

                             

                           भावनिक बुद्धीमत्ता
                   बुद्धिमत्ता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अल्बर्ट आईन्स्टाईनची प्रतिमा उभी राहते कारण आईन्स्टाईनची बौद्धिक क्षमता आणि त्याचा बुध्दीगुणांक(IQ) हा नेहमीच सर्वांच्या औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. म्हणूनच आईन्स्टाईनच्या पश्चातही त्याच्या मेंदूवर विविध संशोधने सुरू आहेत. आपल्यातील प्रत्येकाला आपलीही बुद्धीमत्ता आईन्स्टाईन सारखी असावी असे केव्हा ना केव्हा तरी वाटत असते,कारण  शालेय जीवनातील यश संपादन करण्यापासून ते व्यावसाईक जीवनात यशस्वी होण्यापर्यंत बुध्दीगुणांक (Intelligent Quotient) किंवा बुद्धिमत्ता  महत्वाची मानली जाते आणि अशाप्रकारची बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करत असतो. त्या करिता विविध मानसिक सराव करतोच शिवाय बुध्दीगुणांक वाढीसाठी औषधेही घेत असतो. खासकरून पालक मंडळी आपल्या पाल्यांच्या बुद्धीमत्ता विकासासाठी नेहमी धडपडत असतात.मानवाची विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती त्याच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचेच द्योतक आहे. बुद्धिमतेच्या जोरावरच त्याने परग्रहापर्यंत मजल मारली आहे. आता तर त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार केला आहे.तर्क,विश्लेषण,आकलन, समस्येची सोडवणूक यासारख्या क्षमतांना उपयोजनात आणणारी सामान्य बुद्धिमत्ता महत्वाची आहेच,पण अश्या प्रकारच्या बुद्धिमत्तेला आपण नको इतकं तर महत्व देत नाही ना? याचा विचार करायला हवा.
            कारण आपल्या संपूर्ण जीवनात घडणाऱ्या सामान्य वा क्लिष्ट व्यवहारातील गुंतागुंत केवळ सामान्य बुद्धिमत्तेच्या(IQ) जोरावर  साेडवताना आपण मात्र, त्यामध्ये निर्माण होणाऱ्या भावना व त्यांचा परिणाम याचा विचार करत नाही.परिणामी बुद्धिमत्तेचा कस लागूनही व्यवहारात अपेक्षित यश संपादन करता येत नाही. म्हणूनच जीवनात यशस्वी होण्यासाठी भावनांना विचारत घेणे व त्यांचा योग्य वापर करणे अत्यावश्यक आहे यालाच भावनिक बुद्धीमत्ता (Emotional Intelligence) असे म्हटले जाते. भावनांचा व्यक्तीच्या मनोशारीरीक अवस्थांवर, वर्तनावर आणि एकूणच त्याच्या कार्यपद्धती वरती अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होत असतो. नकारात्मक विचार व भावनांचा शरीरावर होणारे परिणाम किती भयानक असतात हे सर्वश्रुत आहेच.  अलिकडलच्या संशोधनानुसार व्यक्तीचे यशापयश हे सामान्य बुद्धिमत्ते(IQ) पेक्षा भावनिक बुद्धिमत्ते (EQ)वरती अधिक अवलंबून असते. यशस्वी व संतुलित जीवन विकासामध्ये सामान्य बुद्धबीमत्ता केवळ २०% तर भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा तब्बल ८०% इतका असतो हे सर्वमान्य झाले आहे.व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक विकासासह त्याचा भावनिक विकास होणे सुखी जीवनासाठी आवश्यक असते. भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना समजून घेतल्यास भावनांचा योग्य विकास होणे सहज शक्य आहे. 
                       डॅनियल गोलमन यांनी आपल्या  Emotional Intelligence: why it can matter more than IQ या पुस्तकात भावनिक बुद्धिमत्तेची (EQ) सविस्तर चर्चा केलेली आहे. स्वतःच्या भावना ओळखून त्यांचे योग्य व्यवस्थापन करता येऊन स्वयंप्रेरणेने कार्यास सिद्ध होणे शिवाय इतरांच्याही भावना ओळखता येणे आणि यांमधून सामाजिक आंतरक्रिया सुरळीतपणे पार पाडणे हे सर्व भावनिक बुद्धिमत्तेमध्ये अपेक्षित आहे. भावनिक बुद्धीमत्ते मध्ये एकूण पाच घटकांचा विचार केला जातो.  ते घटक खलील प्रमाणे.
१) स्वजाणीव ( Self awareness):- 
               आपल्या मनात  विचारचक्र अविरतपणे चालू असते त्यातून विविध भावना निर्माण होत असतात. भावनिक बुद्धिमत्तेच्या पहिल्या टप्प्यात आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांना जाणणे अपेक्षित आहे. सुखकारक व दुःखकारक भावना ओळखता यायला हव्यात शिवाय त्यांना नामाभिधान देखील करता यायला हवे. भीती,राग,मत्सर,द्वेष,न्यूनगंड यासारख्या अहितकारक तर प्रेम,आपुलकी, आत्मविश्वास, करुणा यासारख्या हितकारक भावना जाणवत येणं महत्वाचं आहे. भावना ओळखता आल्या नाही तर, भावनिक स्वास्थ्य सहजपणे साध्य करता येत नाही. यातूनच माणसाला स्वतःच्या कार्यक्षमतेचीही ओळख होते.
२) भावनांचे नियमन/ व्यवस्थापन (Self Regulation):-
                   दुसऱ्या टप्प्यात भावनांचे योग्य व्यवस्थापन करता येणं अपेक्षित आहे. मनात निर्माण होणाऱ्या भावनांचे दमन न करता त्यांचे योग्य नियमन करता यायला हवं.भावनांना नियंत्रीत करता येण्या सोबतच त्यांना योग्य दिशा देता यायला हवं. भावनांचा योग्य समतोल साधला गेला पाहिजे.कोणतीही कृती करण्यापूर्वी त्या मागील भावनांचे योग्य आकलन करता यायला हवं. दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद देत असतानाही भावनांना विचारपूर्वक हाताळता येणं आवश्यक आहे.
३) स्वयंप्रेरणा (Self-Motivation):-  
                      स्वयंप्रेरीत होऊन कार्य सिद्धीस पोहचवणे हे उच्च भावनिक बुद्धिमत्तेचे महत्वाचे लक्षण आहे. कोणत्याही अडथळ्यांना न जुमानता पुढाकार वृत्तीने ध्येय साध्य करता येण्यासाठी व्यक्तीने स्वयंप्रेरित असायला हवं. तात्काळ मिळणाऱ्या लाभपेक्षा दीर्घकालीन लाभाचा विचार, स्वयंप्रेरणेने रुजविता येतो. भावनांच्या जाणिवेने, हितकारक भावनांच्या निवडण्याने व त्यांवर नियंत्रण ठेवून योग्य दिशादर्शन केल्याने स्वयंप्रेरणा अधिक बळकट होईल. 
४) तदानुभूती (Empathy):- 
                     व्यक्तीला स्वतःसह इतरांच्याही भावना ओळखता येणं आवश्यक आहे.एखाद्याच्या वर्तनाचा चुकीचा अर्थ काढण्यापेक्षा, त्यामागील भावनांचा उलगडा करता येणं व त्यांना समजून घेणं हे उच्च भावनिक बुद्धिमत्तेचे अंग आहे. समोरील व्यक्ती ही आपल्यासारखीच असून, तिच्याही मनात आपल्यासारख्याच भावना निर्माण होतात हे समजून घेणे गरजेचे असते. इतरांच्या भावनांनाचा स्वीकार करणे, समजून घेणे व त्यांचा आदर करणे आपल्यातील तदानुभूती प्रगल्भ करते.इतरांच्या बद्दल कणव बाळगणे व त्यांच्या सुख दुःखात त्याच भावनेनं सहभागी होता यायला हवं.
५) सामाजिक कौशल्ये( Social Skills):- 
                   माणूस हा सामाजिक प्राणी आहे.जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याचा समाजाशी संबंध येत असतो.यातून विविध सामाजिक आंतरक्रिया घडत असतात. या आंतरक्रिया प्रभावी व फलदायी होण्यासाठी भावनांचा सुयोग्य वापर होणे आवश्यक आहे. व्यक्तीला व्यक्तिगत, सामाजिक व व्यावसायिक जीवनात वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. या भूमिकांना न्याय देण्यासाठी भावना विकासाद्वारे सामाजिक कौशल्ये आत्मसात करणे सहज शक्य आहे. संभाषण कौशल्य, नेतृत्व कौशल्य, समस्या सोडवण्याचे कौशल्ये या सारखी जीवनोपयोगी सामाजिक कौशल्ये भावनिक विकासातून सहजच आकारली जातात.
     बदलती जीवनशैली, सामाजिक आंतरक्रियेचे बदलते स्वरूप व व्यक्तीच्या व्यक्तिगत इच्छा अपेक्षा यातून भावनांचा कल्लोळ वाढतो आहे.याचा व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो आहे. ताणतणाव,चिंता,काळजी,निराशा,उदासीनता,चिडचिडेपणा या सारख्या अहितकारक भावना दिवसेंदिवस वाढत आहेत. मनोकाईक (Psychosomatic) आजारांचे प्रमाण वाढते आहे.नातेसंबंधातील बिघाड ही समस्या घराघरांत जाणवत आहे. शिवाय अनियंत्रित भावनांचा तोटा व्यक्तीसह समाजासही होत आहे. अशा स्थितीत भावनिक बुद्धीमत्ता समजून घेणे व तिचा दर्जा वाढविणे काळाची गरज ठरत आहे.

Let's enhance our EQ

Mr.Abhijeet Manav
(Life Coach, Mind Trainer & Motivational Speaker)
9503839760
www.exceltrainings.in

Sunday, 19 January 2020

ART OF COMMUNICATION

                         
                         
                             संभाषण कला

                         संभाषण हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. प्रत्येक माणसाला आपल्या मनोशारीरीक गरजा भागविण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते आणि त्याकरिता त्यास सतत इतरांशी आंतरक्रिया करावी लागते. ही आंतरक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात संभाषणाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. माणसाच्या मनात सतत प्रवाहित होणाऱ्या विचारांना व त्यातून निर्माण होणाऱ्या विविध भावना, कल्पना व  दृष्टिकोन यांना सहज व्यक्त करता येणे निरोगी व विकसित जीवनासाठी अत्यावश्यक असते. ही व्यक्त होण्याची प्रेरणाच संभाषणाचे मूळ आहे. तसे पाहता संभाषण ही प्रत्येक मानवाची सहज प्रवृत्ती आहे. पण ते अधिक फलदायी, प्रभावी आणि उत्कृष्ट होण्यासाठी व्यक्तीला विशेष प्रयत्न करावे लागतात. संभाषण प्रक्रियेकडे ती एक कला आहे वा कौशल्य आहे या दृष्टिकोनातून पहावे लागते व त्या करीता आवश्यक असणाऱ्या क्षमता व गुणधर्म विकसित करावे लागतात.                       प्रभावी संभाषणामुळे सामाजिक आंतरक्रिया अधिक सुलभ आणि अधिक फलदायी होतात यात शंका नाही. व्यक्तीला व्यक्तिगत,सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी संभाषण कला अवगत व्हायलाच हवी. या करता तिला संभाषण प्रक्रिया आणि या कला अवगत करण्यासाठी आवश्यक गोष्टी समजावून घ्याव्या लागतील.
      संभाषण प्रक्रिया ही द्विमार्गी असते. या करिता दोन किंवा त्यापेक्षा अधिक सहभागीची आवश्यकता असते. ही प्रक्रिया खालील टप्प्यात घडते.
१. संदेशाची बांधणी:- यात व्यक्ती ज्या संदर्भात व्यक्त व्हायचे आहे त्या बद्दल विचार करून त्यांना संघटित करते व त्यांना योग्य शब्दाकार देऊन शाब्दिक किंवा अशाब्दीक संदेश तयार करते.
२. माध्यमाची निवड:- संदेशाचे स्वरूप म्हणजेच तो शाब्दिक आहे की अशाब्दीक व संदेश ग्रहनकर्ता यांचा विचार करून माध्यमाची निवड होते. जसे शाब्दिक असेल तर बोलणे वा लिहिणे याचा वापर होतो तर अशाब्दीक असेल तर शारीरिक अवयवांचा वापर होतो. याशिवाय त्याकरिता पत्र, ईमेल,टेलिफोन वा प्रसार माध्यमे यांची माध्यम म्हणून निवड केली जाते.
३. संदेशाचे ग्रहण:- संदेश ग्राहनकर्ता आलेल्या संदेशाचे पूर्वानुभव व विचारक्षमता यांच्या जोरावर संदेशाचे आकलन करून घेते.
४. प्रतिसाद:- संदेश ग्राहनकर्ता त्याला समजलेल्या संदेशावर त्याच्या कुवतीनुसार प्रतिसाद देतो.
५. प्रतिसादाची पडताळणी:- आलेला प्रतिसादवरून संभाषणाचा हेतू साध्य झाला आहे की नाही याची पडताळणी होते व पुन्हा संभाषण चालू ठेवायचे वा खंडित करायचे याचा विचार होतो.
                (वास्तविक संभाषणाची सार्थकता ही ज्या हेतूने संभाषण सुरू केले होते त्याच्या पूर्ततेत असलेने जो पर्यंत तो हेतू साध्य होत नाही तो पर्यंत विविध मार्गांनी संभाषण चालूच ठेवावे त्याकरिता संभाषण कर्त्यांनी लवचिकतेच्या तत्वाचा अंगीकार करावा.)
        संभाषण प्रक्रिया व त्यातील टप्पे यांची समज व्यक्तिमध्ये त्याबाबतची सजगता निर्माण करते व प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीची भूमिका काय आणि कशी असायला हवी याबद्दल योग्य दिशादर्शन करते.
     संभाषण कला ही प्रत्येक व्यक्तीला सहज साध्य करता येण्याजोगी आहे. त्याकरिता व्यक्तीस संभाषणाची पंचसूत्री निश्चित मदत करेल.
 पंचसूत्री:-
१. ऐकण्याची कला हस्तगत करा:-
      ऐकणे ही सहज घडणारी क्रिया असली तरी काय आणि कसं ऐकायचं हे मात्र शिकावं लागत. बऱ्याचदा संभाषण म्हटलं की लोकांना फक्त बोलणेच महत्वाचे वाटते पण या प्रक्रियेत बोलण्यापेक्षाही ऐकण्याला अधिक महत्व आहे. अस म्हटलं जातं की माणसाला तोंड एकच आहे पण कान मात्र दोन आहेत कारण की त्याने जेवढे बोलावे त्याच्या दुप्पट ऐकावे. होय, हे खरे आहे. उत्कृष्ट संभाषणकर्ते अधिक ऐकतात. समोरचा व्यक्ती बोलत असताना ते त्याच्याशी, त्याच्या बोलण्याशी ऐकण्याच्या माध्यमातून एकरूप होतात.बोलणारा फक्त शब्द फेकत नसतो तर तो आपल्या भावना व्यक्त करत असतो म्हणून त्यांचे योग्य आकलन होण्यासाठी व्यक्तीने लक्षपूर्वक(Attentive)व तन्मयतेने ऐकायला हवे. बोलणाऱ्याच्या अनुभवला त्याच्या नजरेतून पहावे. त्याच्या बद्दल तदानुभूती बाळगावी. बऱ्याचदा लोकांना ऐकलं जात नाही म्हणून लोक व्यक्त होत नाहीत पण संभाषणाच्या माध्यमातून नातेसंबंध अधिक दृढ होण्यासाठी समोरच्याला ऐकणं महत्त्वाचे आहे.
२. संभाषणाचा हेतू कल्याणकारी असावा:-
     प्रत्येक विचारामागे व तो व्यक्त करीत असताना वापरल्या जाणाऱ्या शब्दमागे काही ना काही हेतू असतोच. जर का हेतू टीका करण्याचा,तक्रारीचा,दोष देण्याचा,अपमान करण्याचा, बदनामी करण्याचा असेल तर असे संभाषण चांगले असणार नाही. हेतू हा योग्य व खरी माहिती  पोहचविण्याचा, लोकांना प्रोत्साहित करण्याचा,प्रेरीत करण्याचा,लोकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा,आदर व्यक्त करण्याचा, समजावून सांगण्याचा, आनंदी बनविण्याचा असायला हवा. हेतू चांगला असेल तर शब्दाची निवडही चांगलीच असेल परिणामी संभाषण ही चांगलेच असेल.
३. 'काय' पेक्षा 'कसे' हे लक्षात घ्यावे:- 
        संभाषणामध्ये 'काय?'चा संबंध हा विषयाशी व त्या संबंधी वापरल्या जाणाऱ्या शब्दांशी असतो तर 'कसे?'चा संबंध ते शब्द कशा पद्धतीने वापरले जाणार आहेत याच्याशी असतो. एक संशोधनानुसार संभाषणामध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांना केवळ ७% इतकेच महत्व असते तर ते कश्या पद्धतीने व्यक्त केले जातात यास ९३% इतके महत्व आहे. यामध्ये ३८% आवाज, त्यातील चढ-उतार, लय बद्धता तर ५५% भाग हा अशाब्दीक म्हणजेच शारीरिक भाषेचा आहे. म्हणूनच प्रभावी संभाषणामध्ये आवाज, चेहऱ्यावरील हावभाव,हातवारे आणि संपूर्ण शरीराची हालचाल योग्य संदेश पोचवु शकतात. एकूणच संभाषणामध्ये शब्द 'कसे' बोलले जातात यास विशेष महत्व आहे.
४.लोकांची माहिती ग्रहण करण्याची प्रणाली समजून संभाषण करा:-
              प्रत्येक व्यक्तीची उपलब्ध झालेली माहिती समजून घेण्याची एक विशिष्ट प्रणाली असते,म्हणजे काही लोकांना चित्र स्वरूपातील माहिती अधिक चांगली समजते; त्यास व्हिज्युअल असे म्हणतात, काहींना श्रवणाशी संबंधित शब्द किंवा आवाजातील विविधता यातून चांगला बोध होतो, यास ऑडिटोरी असे म्हणतात तर काहींना प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून चांगले ग्रहण होते त्यास काईनेस्थेटीक असे म्हणतात. तुम्ही संदेश स्वीकारणाराची प्रतिनिधित्व प्रणाली ( Representational System) ओळखून संभाषण केले तर ते अधिक प्रभावी ठरते. शिवाय उत्कृष्ट संभाषण हे व्हिज्युअल, ऑडिटोरी आणि काईनेस्थेटिक या सर्वांचे उत्कृष्ट मिश्रण असते.
 ५. छाप पाडण्यासाठी नाही तर व्यक्त होण्यासाठी बोला:-
     बऱ्याचदा लोक इतरांच्यावर छाप पाडण्यासाठी बोलताना दिसतात. अशा वेळी व्यक्ती जड व अलंकारिक शब्दांचा अधिक वापर करते, परिणामी लोक अशा दांभिक लोकांपासून दूर जातात. लोकांना समजेल, त्यांच्या मनाचा ठाव घेईल अशी भाषा वापरणे योग्य आहे. मनातील विचार अगदी सहजच कसे इतरांपर्यंत पोहचवले जातील हे लक्षात घ्यायला हवे. परिणाम कारक संभाषण साधनेसाठी समोरील व्यक्तीचे लिंग,वय, शैक्षणिक पात्रता शिवाय सांस्कृतिक वारसा याचाही विचार करणे आवश्यक आहे.
        बदलणारी जीवन शैली, वाढणारी स्पर्धा, प्रसार माध्यमाचा वाढता प्रभाव आणि या मुळे माणसा माणसातील वाढता तणाव व नाते संबंधातील दुरावा कमी होण्यासाठी तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला आज संभाषण कला अवगत करणे गरजेचे आहे. संभाषणाची प्रक्रिया आणि पंचसूत्री आपणास उत्कृष्ट संभाषणकर्ता बनवेल याची मला पूर्ण खात्री आहे.

लेखन:-
अभिजीत मानव
(लाईफ कोच, माईंड ट्रेनर आणि मोटिव्हेशनल स्पीकर)
9503839760
www. exceltrainings.in

Saturday, 4 January 2020

SELF RESPONSIBILITY


              

                          
  जबाबदारी कोणाची?

तुम्हाला तुमचं इच्छित जीवन जगण्यापासून कोण थांबवतय?
         १)तुमचं कुटुंब?
        २) तुमचा बॉस?
        ३) तुमचा पती?
        ४)तुमची पत्नी?
        ५)तुमच्या भोवतालची माणसे?
        ६) तुमचं शिक्षण?
        ७)तुमची आर्थिक बाजु?
                                          वरील प्रश्नाच्या उत्तरादाखल तुमच्याकडे वरीलपैकी एक किंवा आणखीन वेगळं कारण असेल तर तुम्ही कधीच तुम्हाला इच्छित जीवन जगू शकत नाही. तुम्हाला इच्छित  जीवन जगण्यापासून थांबवणारे कोण असेल तर ते तुम्ही स्वतः आहात, हो! हेच सत्य आहे. हे पटत नसेल तर तुम्ही स्वतःची जबाबदारी घेण्यापासून दूर पळताय.
                स्वतःला अपेक्षित असलेलं समृद्ध , सुखी ,आनंदी व समाधानी जीवन घडवण्याची संपूर्ण जबाबदारी हि व्यक्तीची स्वतःची आहे. हे एक मूलभूत तत्व आहे कि ज्यामुळे जीवन जगत असताना आपल्या वाट्याला येणारे अपेक्षित - अनपेक्षित अनुभव , चांगल्या - वाईट घटना , स्वतः व इतरांकडून केल्या जाणाऱ्या क्रिया शिवाय स्वतः व  इतरांनी दिलेल्या प्रतिक्रिया, आपण केलेले वर्तन,घेतलेले निर्णय  व त्यामुळे हाती पडलेले निकाल आणि या सगळ्यांमधून निर्मित जीवनाला आपण स्वतःच जबाबदार आहोत याची प्रचिती येते.
                                    व्यक्ती बऱ्याचदा स्वतःच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या  वाईट  घटनांना व अनुभवांना नशीब, दैव,भाग्य  यांची लेबल्स लावून संपूर्ण जीवनाची जबाबदारी देवावर टाकून हतबल हताश व निराशामय जीवन जगतो. आपल्या वाट्याला आलेलं सर्वकाही हे आपल्या मागील जन्मातील पापकृत्याचे वाईट कर्माचे फळ आहे, हे अगोदरच लिहून ठेवलय, जे होत आहे तेच योग्य आहे,हे असच चालणार, हे मी बदलू शकत नाही असा कुचकामी निराशावादी विचार व्यक्तीला स्वजबाबदारी पासून दूर लोटतो. व्यक्तीला सद्यस्थिती बदलण्याचा विचारही मनाला शिवत नाही व ती व्यक्ती तसा प्रयत्नही करत नाही.
             आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेस आपणच जबाबदार आहोत आपले विचार भावना दृष्टिकोन व वर्तन जबाबदार आहे याची पूर्ण जाणीव होऊन त्या नकारात्मक बेजबाबदार विचार, दृष्टिकोन,धारणा व वर्तन यांना  सकारात्मक बाजू देऊन जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणे मानव्याच्या विकासातील पहिली पायरी आहे. जीवनाची १००% जबाबदारी स्वीकारताना कुटुंब, मित्र, समाज, नातेवाईक,भोवतालची आर्थिक,राजकीय व धार्मिक परिस्थिती यांना दोष देणे व त्याबद्दल निरर्थक तक्रार करणे थांबवायला हवं. लोक माझा फायदा घेतात, मला बळीचा बकरा बनवलं,मला लोकांनी त्यांच्या फायद्या करीत वापरलं, मला भावनिक बनवलं अशा नकारात्मक विचारांना तिलांजली द्यायला हवी. तुमच्या बाबतीत घडलेल्या कोणत्याही घटनेबद्दल इतरांना दोष देण्यात किंवा त्याच्याविषयी तक्रार करण्यात काहीही हशील नाही कारण ......
हे तुम्ही आहात ज्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतले नाहीत ...
हे तुम्ही आहात ज्यांनी इतरांना बोलण्याची संधी दिलीत...
हे तुम्ही आहात ज्यांनी शिस्त पाळली नाही...
हे तुम्ही आहात ज्यांनी वेळेवर काम पूर्ण केलं नाही....
हे तुम्ही आहात ज्यांनी इतरांना नेहमीच खुश ठेवण्याचा चंग बांधला होता...
हे तुम्ही आहात ज्यांनी स्वतःचे आरोग्य जपले नाही....
हे तुम्ही आहात ज्यांनी आळसाला मित्र केलं आहे...
 हे तुम्ही आहात ज्यांनी वेळेला कधीच महत्व दिल नाही....
हे तुम्ही आहात ज्यांनी सहनशील असल्याचा आव आणला होता...
हे तुम्ही आहात ज्यांनी इतरांना तुमच्याशी सलगीने वागायची परवानगी दिली होती...
हे तुम्ही आहात ज्यांनी खोटं बोललेलं होत....
हे तुम्ही आहात ज्यांनी स्वतःला कधीच बदलण्याचा प्रयत्न केला नाही...
                          अशा कित्येक गोष्टी तुम्ही करत आलेल्या आहात कि ज्याचा परिणाम म्हणजे तुमची आजची केविलवाणी अवस्था आहे आणि हे दुसरं कोणीही बदलू शकत नाही तुमच्याशिवाय, खरंय ना?
            जीवनात घडणाऱ्या काही घटनांवरती आपले नियंत्रण असते पण काही घटना नियंत्रणबाह्य असतात अशा घटनांबद्दल उद्विन्ग होवून स्वतःला अहितकारक प्रतिक्रिया देण्यापेक्षा योग्य प्रतिक्रिया देवून त्यांना सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे कारण वर्तमान काळात दिलेल्या याच प्रतिक्रियांमधून भविष्यातील परिणामांना आपण अनुभवणार आहोत आणि म्हणूनच त्याची जबाबदारी आताच घेऊन आपण योग्य ते वर्तन करणे गरजेचं आहे.
                इंग्रजीमध्ये असं म्हटलं जात कि you can’t hire someone else to do push ups for you याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे कि तुमचं काम तुम्हालाच करावं लागेल तेव्हाच सुखी, आनंदी,समाधानी व समृद्ध जीवनाची इच्छा तुम्ही करू शकता. जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणे म्हणजे कोणते आव्हान स्वीकारणे वगैरे असं अजिबात नसून मानवी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे व आपल्यातील उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन ठरवलेले जीवित ध्येय साध्य करण्यास आपल्यातील सुप्त क्षमतांना जागृत करून त्यांना योग्य दिशेने मार्गक्रमण करणे असे म्हणता येईल. विनाकारण तक्रार करणे, चुकीच्या ठिकाणी तक्रार  करणे व निमित्त करून ध्येयपूर्तीसाठी आवश्यक कार्यामध्ये टाळाटाळ करणे  यांसारख्या गोष्टींपासून जाणीवपूर्वक मुक्तता मिळवून जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी.
                           स्वामी विवेकानंदानी तर म्हटलेच आहे कि 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस 'आपण आपल्या जीवनाचं शिल्प कस आणि किती सुंदर करायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.हे जीवनशिल्प एकतर सुंदर असेल किंवा कुरूप असेल. हे अवलंबून आहे आपले विचार , कल्पना,भावना , दृष्टिकोन ,धारणा ,मते, सवयी व यामधून निर्माण होणाऱ्या वर्तनावर व त्यातून घडणाऱ्या परिणामांवर.  ते शिल्प अधिकाधिक सुंदर आकर्षक सुरेख आणि समृद्ध होण्यासाठी आपण स्वतःच प्रयत्न करायला हवेत आणि हे सहज शक्य आहे जर आपण तयार आहोत,जीवनाची १००% जबाबदारी घ्यायला.

 लेखन:-
अभिजीत मानव
(लाईफ कोच,माईंड ट्रेनर आणि मोटिव्हेशनल स्पीकर)
Excel Training System
9503839760
abhijeetmanv.blogspot.com
www.exceltrainings.in

Beyond Habits: The Power of an Identity Shift

  Beyond Habits: The Power of an Identity Shift Most people approach change backward. They say, "If I go to the gym every day (Action),...